Friday, February 8, 2008

"आनंदाच झाड" !

आनंदाच झाड माझ्या अंगणात आहे
खोल रुजलेले माझ्या जिवनात आहे

उन पाउस झेलतं
साद नभाला घालतं
पानगळ सोसुनही,
पुन्हा बहरुन येतं

पाखरांचा सुर त्याच्या मोहरात आहे
चैतन्याच गीत त्याच्या काळजात आहे

आनंदाच झाड माझ्या अंगणात आहे
खोल रुजलेले माझ्या जिवनात आहे



तुम्हाला माहीतीय "आनंदाच झाड" कसं उगवत ?

"कल्पनेची एक बी घ्यायची....
तीला मायेच्या जमीनीत पेरायचं....
तीला कॊतुकाचं खतं घालायचं...
आणि नित्यनीयमानं प्रेमाच्या झारीतुन पाणी घालायचं त्याच्या मुळाशी..."


खरतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो, त्या स्वभावाशिवाय त्याला जगताच येत नाही. तो स्वभावच त्याची शक्ती असते.., तोच त्याला आनंदाप्रत पोहचवत असते..सांभाळुन ठेवत असते..

आनंदाची पाठराखण करणारे अशी कितीतरी माणसं दिसतील. भगतसिंग..मदनलाल धिंग्रा.., सावरकर, असे एक ना अनेक उदाहरण देता येतील. "स्वातंत्र्य" हाच एकच त्यांचा स्वभाव..तोच स्वभाव त्यांना आनंदाप्रत घेउन गेला. त्याच आनंदाच्या सामर्थ्याने त्याना प्रतीकुल परीस्थितीतुन तरुन नेले..

कष्टांची तमा त्याना नाही.. पण आनंदाने काट्यानाही गोंजारणारी.... भयंकर वास्तवातही मग आपली स्वप्नांची दुनीया बसवीणारी... कोणी कितीही त्यांच्या स्वप्नांवर अविश्वास दाखवला तरीही त्याच अविश्वासाच्या घाट्ग्यावर विश्वास ठेऊन स्वप्न बघणारी.

भग्न स्वप्नाच्या तुकड्याना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही ! मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी बांधुन ठेवता येत नाही ! त्याला भविष्याच्या गरूड्पंखांचं वरदानही लाभलेलं आहे. एखाद स्वप्न पाहणं, ते फ़ुलवणं, ते सत्यात उतराव म्हणून धडपडण, त्या धडपडीतला आनंद लुट्णं .. आणि दुर्दैवानं ते स्वप्न जरी भंग पावल तरी त्याच तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पावलांनी दुस~या स्वप्ना माने धावणं हाच मानवी स्वभावधर्म आहे. मनुष्य जिवनाला अर्थ येतो तो त्यामुळं !

खर सांगायच तर... "आनंद" ही एक स्थीती आहे.. की ज्याप्रत माणसाने पोहचण्याची धडपड केली पाहीजे.. ऊन-सावली... सुख.- दुख... रडणे-हसणे...दैव-प्रारब्ध-कर्म हे सगळे क्षणीक बघा..क्षणा क्षणाला सरड्यासारखे रंग बदलणारे. आनंदाने त्यांच्यावरही मात करता येते.

आनंद असावा त्या "बी " सारखा... जमीनीत खोल काळोखातुन अंकुरुन सुर्याकडे झेपावणारा
आनंद असावा त्या "झाडा" सारखा... वणव्यात पोळुन सुद्धा पुन्हा पालवीची आस धरणारा
आनंद असावा त्या "लवचीक वेली" सारखा... कुठल्याही स्थितीतुन तरुन जाणारा..
आनंद स्वस्त आहे... कारण त्यासाठी पैसा मोजावा लागत नाही
आनंद कालातीत आहे.. कारण तो कुठल्याही काळात मिळू शकतो.
आनंद अक्षय आहे.. कारण कितीही वाटला तरी संपूच शकत नाही
आनंद ध्रूवा सारखा अढळ आहे.. एकदा सापडला की कोणीच हिराउ शकत नाही...


आपणा सर्वांनाही हा अमुल्य आनंद मिळो हीच श्रीचरणी प्राथना ।

--------------------------------------------
[वरील लेख मी.. श.ना.नवरे लिखीत "आनंदाच झाड" ह्या त्यांच्या पुस्तकावर आधारीत चित्रपटावरुन लीहीले आहे. त्यावर "आनंदा" विषयी मला जे वाटल ते मी शब्दात बसवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो आपणासही आवडेल.]

धन्यवाद.
मंदार

No comments: